मान्सून केरळमध्ये   

नवी दिल्ली : मान्सून (नैऋत्य मोसमी वारे) यंदा केरळमध्ये आठ दिवस आधीच दाखल झाला आहे. २००९ नंतर म्हणजेच, तब्बल १६ वर्षांनंतर मान्सूनचे केरळमध्ये लवकरच आगमन झाले आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. याआधी, २००९ मध्ये २३ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. 
 
सामान्यतः मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर, ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतो. गेल्या वर्षी मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. २०२३ मध्ये ८ जून, २०२२ मध्ये २९ मे, २०२१ मध्ये ३ जून, २०२० मध्ये १ जून, २०१९ मध्ये ८ जून आणि २०१८ मध्ये २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होतो.
 
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता, तो खरा ठरला आहे. मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती बनली असून रेंगाळण्याची सुतराम शक्यता नाही. यामुळे बळीराजानेही लगबग सुरु केली आहे. 
 
१९७५ पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, १९९० मध्ये मान्सून सर्वांत लवकर म्हणजे १९ मे रोजी म्हणजे, १३ दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला होता. आता, आठ दिवस आधी तो केरळमध्ये दाखल झाला आहे.१९१८ मध्ये मान्सून ११ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. तर, १९७२ मध्ये १८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता, असे सांगितले जाते.
 
मान्सूनच्या आगमनाची तारीख आणि देशभरात हंगामात पडलेल्या पावसाचा थेट संबंध नसल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. केरळमध्ये मान्सूनचे लवकर किंवा उशिरा आगमन, ही गोष्ट संपूर्ण भारतातील त्याची प्रगती कशी राहील, याचे संकेत देत नाही, असे हवामान विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले.मान्सूनवर मोठ्या प्रमाणात होणार्‍या बदलांसह जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक हवामान घटकांचा प्रभाव राहतो, असेही त्यांनी नमूद केले.
 
एप्रिल महिन्यात हवामान विभागाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पावसाचा अंदाज हवामान वर्तविला होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल; तर पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाच्या चांगल्या सरी कोसळतील. मान्सूनवर ‘अल निनो’चा धोका नसेल आणि देशात चांगला पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले होते.
 
काल मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीपचा भाग, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा अनेक भाग तसेच नैऋत्य आणि पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भाग व्यापला. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
 
देशात २०२४ मध्ये ९३४.८ मिमी पाऊस पडला होता. तो, सरासरीच्या १०८ टक्के होता. २०२३ मध्ये ८२० मिमी पाऊस पडला होता, जो सरासरीच्या ९४.४ टक्के होता. २०२२ मध्ये ९२५ मिमी, २०२० मध्ये ९५८ मिमी पाऊस पडला होता.देशातील ६० टक्के शेती अजूनही मान्सूनवर अवलंबून असून लोकसंख्येपैकी ४२ टक्के जनता शेती करते. देशाच्या जीडीपीमध्ये १८.२ टक्के योगदान कृषी क्षेत्राचे आहे. पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते.
 
१६ वर्षांनंतर प्रथमच लवकर दाखल
 
पुढील दोन ते तीन दिवस हवामान अनुकूल असल्याने मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.  मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी भुते म्हणाल्या, मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असून आठवडाभरआधीच मान्सून केरळात पोहोचला असून तो हळूहळू महाराष्ट्राकडे सरकत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Related Articles